वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- १२९
पुस्तकाचे नाव - विचार दीप
लेखकाचे नाव - डॉ .शुभांगी कुंभार
प्रकाशन व आवृत्ती- अथर्वकुणाल प्रकाशन
पृष्ठे संख्या– १६०
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २५०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१२९||पुस्तक परिचय
विचारदीप
डॉ . शुभांगी कुंभार
विचारांचा दीप जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. डॉ. शुभांगी पवार लिखित विचारदीप हा निबंधसंग्रह नेमका असाच एक प्रकाशस्तंभ आहे. विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक विषयांवर लेखन करताना लेखिकेने आपल्या चिंतनशीलतेचा, अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचा आणि अनुभवसंपन्न लेखनकलेचा प्रभावी परिचय करून दिला आहे.
या पुस्तकात एकंदर चौदा निबंध असून प्रत्येक निबंध हा स्वतंत्र विचारविश्व उलगडणारा आहे. माझ्या स्वप्नातील भारत हा निबंध वाचताना तरुणाईसमोर एक उन्नत, प्रगत आणि मूल्याधिष्ठित भारताची प्रतिमा उभी राहते. छत्रपती शिवाजी महाराज : जीवन व कार्य तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे दोन्ही निबंध वाचताना वाचकांना स्वराज्य संस्थापकांच्या कार्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राजकारणाचा अभ्यास लेखिकेने प्रभावी शब्दांत मांडला आहे.
इतिहासातील महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना लेखिकेने केवळ माहिती दिलेली नाही, तर त्यांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित केली आहे. या तिन्ही व्यक्तिमत्त्वांनी केलेले समाजपरिवर्तन आणि शिक्षणक्षेत्रातील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व या निबंधांमधून ठळकपणे दिसून येते.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची रुजवणूक हा निबंध विशेषतः शिक्षणक्षेत्रातील वाचकांना भावणारा आहे. आजच्या डिजिटल युगात वाचनाची गोडी कमी होत चालली असताना वाचनामुळे होणारे चारित्र्यनिर्माण आणि विचारशक्तीची वाढ याची जाणीव हा निबंध करून देतो. नाथांची भारुडे लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम हा लेख लोकपरंपरेतील शिक्षणपद्धतीचा अभ्यास करणारा आहे, तर सिद्धार्थ गौतम बुद्ध : जीवन व कार्य हा निबंध शांतता, करुणा आणि समता यांचा संदेश पोहोचवतो.
याशिवाय काही निबंध हे अत्यंत ज्वलंत आणि समकालीन प्रश्नांवर भाष्य करणारे आहेत. स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते? या लेखात वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करून देत स्वच्छतेच्या राष्ट्रीय मोहिमेला व्यक्तिगत स्तरावर कसे हातभार लावता येईल यावर विचार केलेला आहे. पाणी हेच जीवन या निबंधात जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले असून हवामान बदल या लेखात पर्यावरणीय संकटांवर प्रकाश टाकला आहे. राष्ट्रसंतांना अपेक्षित युवा हा निबंध समाजहितासाठी कार्य करणाऱ्या सजग, जबाबदार आणि चारित्र्यसंपन्न युवकाची गरज अधोरेखित करतो. शेवटी खरंच ‘ती’ बदलली आहे का? या निबंधात स्त्रीच्या सामाजिक स्थितीचा आणि बदलत्या काळातील तिच्या भूमिकेचा अभ्यास केला आहे.
डॉ. शुभांगी पवार या मूळतः शिक्षिका असल्याने त्यांचे लेखन सोप्या, सहज आणि प्रभावी भाषेत आहे. त्यांनी अनेक निबंध स्पर्धांत यश मिळवले असून त्या अनुभवातून परिपक्व झालेलं लेखन या ग्रंथात दिसून येतं. पुस्तकातील प्रत्येक निबंध वाचकाला विचार करण्यास भाग पाडतो, प्रेरणा देतो आणि समाजाबद्दलची जबाबदारी वाढवतो.
विचारदीप हा केवळ निबंधसंग्रह नाही, तर विद्यार्थ्यांसाठी आदर्श वाचन, शिक्षकांसाठी मार्गदर्शक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी चिंतनाचा खजिना आहे. इतिहास, समाज, शिक्षण आणि पर्यावरण या सर्वच क्षेत्रांचा आढावा घेताना लेखिका जिथे विचारांची दिशा दाखवतात तिथेच नव्या पिढीला कृतीची प्रेरणा देतात.
खऱ्या अर्थाने हा ग्रंथ विचारांचा दीप प्रज्वलित करणारा असून, तो प्रत्येक ग्रंथप्रेमीने आपल्या वाचनात सामील करून घ्यावा अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment