*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणाची ज्ञानगंगा* 📚🌹
3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण महिला शिक्षण दिन आणि बालिका दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो . समस्त स्त्री वर्गासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे ज्या ठिकाणी या ज्योतीचा जन्म झाला त्याच ठिकाणी आम्ही या शिक्षण क्षेत्रात येऊन कर्तव्य बजावत आहोत याहून सुवर्णक्षण तो काय . एका सावित्रीच्या लेकीने क्रांतीज्योती शैक्षणिक प्रवाह असे आपल्या ब्लॉगला आणि युट्युब चॅनेल ला नाव देऊन क्रांतीज्योतीला वाहिलेली शब्द पुष्पांजली 📚🌹🌺🌸🌷
सावित्रीबाईंची थोरवी
🙏🏻📚✒️🌹
नायगावच्या कुशीत जन्मली
स्त्री शिक्षणाची जननी
सावित्रीबाईंची थोरवी गाते
सदैव माझी ग वाणी ॥ धृ॥
स्त्रियांच्या उद्धारासाठी
पती राजाच्या मागे गेलीस झणी
सत्यवानाच्या सावित्रीपेक्षाहि
सत्य सावित्री झालीस ग राणी ॥१॥
कर्मठ निष्ठूर समाजकंटकांनी
किती केली ग मनमानी
सभ्य संयमी वर्तणुकीतून
भल्याभल्यांना पाजलेस तू पाणी ॥२॥
स्त्रीशिक्षणाची आणलीस गंगा
खेडोपाडीच्या लेकींच्या अंगणी
दिन दुबळयांची सेवा करून झालीस
विद्येची देवता तू ज्ञानदायीनी ॥ 3॥
अक्षरलेखणीशी जोडून नाते
काव्यफुलांतून गायिलीस गाणी
स्मरण तुझे अखंड राहते
प्रत्येक स्त्रीच्या ह्रदयातुनी ॥४॥
सावित्रीबाईची थोरवी गाते
सदैव माझी ग वाणी
✒️ 🙏🏻📚🌹
एखाद्याच्या आयुष्यात इतके पदर ! इतके पापुद्रे ! एक सोलावा तर दुसरा पापुद्रा निघतो . ही सर्व काही अशक्यकोटीतलं ! ज्या काळी स्त्री शिक्षणाची उदासीनता होती त्या काळात समस्त महिला वर्गात सावित्रीबाईरूपी ज्ञानाची ज्योत महात्मा फुले यांनी स्वतःच्याच घरात लावली . याच ज्ञानज्योतीची आता घराघरात ज्योत पेटली आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रात आपल्या तेजाने ती दिवस-रात्र अखंड तळपत आहे .मातीची पाटी आणि झाडाच्या फांद्यांची लेखणी करून शिक्षण वसा घेतलेल्या सावित्रीबाईंना साक्षात त्यांच्या कुंकवाचे आणि काळ्या आईचे भरभरून आशीर्वाद पाठीशी होते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावात खंडोजीराव आणि लक्ष्मीबाई नेवसे पाटील या उभयतांचे पोटी सावित्री हे कन्या रत्न जन्माला आले .लहानपणापासूनच धाडसी ,दणकट असणारी सर्वांची लाडकी सावू धीट आणि जिद्दी होती. वयाच्या नवव्या वर्षीच सावू १८४० साली सौ.सावित्री ज्योतिबा फुले झाली. ज्योतीबांच्या संसारात रममाण होत सावित्रीबाई त्यांच्या साथीने ज्ञानाच्या अखंड महासागरात बुडून गेल्या . मातीवरची अक्षरे कधी हृदयात घुसून बसली हे कळलेच नाही .१८४०ते१८४८ या काळात त्या भरपूर शिकल्या. बहुश्रूत झाल्या. १८४८ साली पुण्यामधल्या तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली .पहिल्याच मुलींच्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका म्हणून काम करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. भारताच्या इतिहासात भारतीय थोर आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेले.
सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक कार्यामध्ये स्वतःच्या जीवनाची आहुती देऊन इतरांच्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरला. शैक्षणिक कार्याबरोबरच सावित्रीबाई सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या. सावित्रीबाई या बहुगुणी होत्या.काव्यफुलें आणि बावनकशी सुबोध रत्नाकर असे दोन कवितासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत.
काव्यप्रतिभा ही दैवी देणगी आहे आणि या देणगीच्या परिसस्पर्शाने काव्य निर्मिती होते ती तनमनापर्यंत पोहोचते.याच त्यांच्यातील दैवी देणगीचे दर्शन या त्यांच्या दोन्ही काव्यसंग्रहातून झाल्याशिवाय राहत नाही. काव्य कसे बहरते हे सांगणाऱ्या काही कविताही या संग्रहात आहेत ज्या रसिकांचे लक्ष वेधून घेतात. संसाराची वाट या कवितेत त्या ज्योतीरावांबद्दल म्हणतात
**माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद*
*जैसा मकरंद कळीतला**
याच कवितेत शेवटी त्या म्हणतात
*करून प्रपंच | आहे तो कठीण*
*बोलून हा शीण I जाईल का?*
तसेच सावित्रीबाईंच्या पत्रांमधून त्यांचीअभिव्यक्ती आपल्याला दिसून येते भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचे आदर्श सहजीवन तसे त्यांनी केलेला त्याग डोळ्यासमोर उभा ठाकतो .रुग्णांची सेवा करतच त्यांना मृत्यूने कवटाळले आणि एका क्रांती पर्वाचा अंत झाला . पण या ज्योतीने लावलेल्या ज्योतींनी सारा प्रदेश ज्ञान प्रकाशात लख्ख केलेला आहे . अशा आमच्या माय माऊलीस शतशः नमन🙏🏻📚🥇🌹🌹📙🌺
*सौ. अंजली शशिकांत गोडसे*
*मर्ढे सातारा*🌹🌹

