Sunday, August 11, 2024

पुस्तक क्र.33 वारी


 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ३ ३

पुस्तकाचे नाव - वारी

प्रकाशन  व आवृत्ती-  कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे .

पृष्ठे संख्या–  २६०

किंमत /स्वागत मूल्य-- ३५० ₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

३ ३ ||पुस्तक परिचय

        वारी

लेखक/ कवयित्री डॉ वसुधा वैद्य


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥

पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥


संत तुकाराम महाराजांच्या या ओव्या मुखी आल्या की आपल्या सर्वांना पंढरीची वारी आठवते . राम कृष्ण हरी ,राम कृष्ण हरी म्हणत सारे आबाल वृद्ध पंढरपूरचा ध्यास धरून त्या विठुरायाच्या दर्शनासाठी ऊन, वारा , पाऊस याची  कशाचीही तमा न बाळगता अखंड चालत राहतात .

        पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो.

या पंढरपूरच्या वारीवर अनेकांनी लिहिले आणि पुस्तके आली अगदी पिक्चरही निघाले तरीही ही वारी सरतही नाही आणि उरतही नाही .

पंढरपूरच्या वारी विषयी विठ्ठलाचे भक्ती विषयी डॉक्टर वसुधा वैद्य यांनी आपल्या अलौकिक शब्दातून कादंबरी रूपी ही वारीचा साकारून आपल्या भक्तीचा महिमा सांगितला आहे .

स्वतः एका वारकरी कुटुंबातल्या त्या असल्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासून तसेच संस्कार झालेले आहेत .त्यामुळे पंढरपूर विठ्ठल वारी आणि रामनाम याचे महत्त्व त्यांना चांगलंच माहिती आहे . आपल्या वारी या कादंबरीत त्यांनी हभप गोविंद पंत काळे यांच्या घरातील विठ्ठलाच्या असीम भक्तीची माहिती आपल्या सर्वांना दिली आहे .याच कुटुंबात जन्मलेला कादंबरीचा नायक मधु या विठ्ठलाच्या भक्तीबद्दल अतिशय अपशब्द बोलून वारकरी संप्रदायालाच नाकारतो आणि गैर मार्गाला लागतो .त्याची आई माई या अखेरच्या घटका मोजत असतात आणि त्यांना भेटण्यासाठी येताना त्याला आपल्या सर्व भूतकाळातील आठवणींचा उजाळा होतो .सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या आयुष्यात काय काय घडत गेलं याचे सुंदर वर्णन डॉक्टर वसुधा मॅडम यांनी आपल्या शब्दात अतिशय सुंदर केलेल आहे .नास्तिक माणूस ते आस्तिक माणूस बनण्यापर्यंतचा हा प्रवास त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून रेखाटला आहे .हे कादंबरी लिहिताना अतिशय बारकावे त्यांनी टिपलेले आहेत .वारीची परिपूर्ण माहिती घेऊनच वारीविषयी त्या शब्द बद्ध झालेल्या आहेत .

डॉक्टर वसुधा वैद्य यांची ही पहिली वहिली कादंबरी .पण हे पुस्तक वाचत असताना हे कुठेही जाणवत नाही की या लेखिकेने पहिल्यांदाच कादंबरी लिहिलेली आहे .अतिशय सुंदर एका मागून एक प्रसंग उलगडत जातात . आणि सारा जीवनपट आपल्यासमोर राहतो .

तेव्हा सर्वांनी नक्कीच ही वारी वाचली पाहिजे आणि अनुभवली पाहिजे .

डॉक्टर वसुधा वैद्य यांच्या पुढील लेखन प्रवासात खूप खूप शुभेच्छा . विठुराया कायम तुमच्यावर वरदहस्त ठेवून उभा आहे .पुस्तकाची बांधणी धाटणी अतिशय सुंदर झालेले आहे कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे यांच्याकडून अतिशय सुंदर अशी ही पुस्तक निर्मिती झालेली आहे तेव्हा सगळ्यांनी ही कादंबरी नक्की वाचावी .

डॉक्टर वसुधा वैद्य यांची ही कादंबरी माहे जानेवारी 2024 उत्कृष्ट पुस्तक परिचय लिहिल्याबद्दल मला भेट मिळाली होती .साक्षात या कादंबरीच्या रूपाने विठुरायाच मला सातारला भेटायला आला आणि या विठुरायारूपी माझ्या माऊलीनं ही कादंबरी प्रत्यक्ष मला भेट म्हणून दिली आणि माझ्या जीवनाच सोनं केलं .धन्यवाद .


सौ .अंजली शशिकांत गोडसे शिर्के

 मर्ढे सातारा .


Wednesday, August 7, 2024

चांदणवेल पुस्तक क्र. 32

 



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ३२

पुस्तकाचे नाव - चांदणवेल

प्रकाशन  व आवृत्ती-  कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे .

पृष्ठे संख्या–  १३४ 

किंमत /स्वागत मूल्य-- २०० ₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

३२ ||पुस्तक परिचय

        चांदणवेल 

लेखक/ कवयित्री -बा.भ. बोरकर


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

कविवर्य बा. भ. बोरकर यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1910 रोजी गोव्यातील कुडचडे या गावी त्यांच्या आजोळी झाला. गोवा हा अत्यंत निसर्गरम्य प्रदेश. बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर, " या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात, कड्याकपारींतून दुधाचे घट फुटतात, आंब्याफणसांची रास असते, इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या धारा खेळतात...." इथे बोरकरांचे बालपण गेले. त्यातही बोरकरांचे गाव बोरी. या गावाच्या सृष्टीचे वर्णन वि. स. खांडेकर यांनी. "स्वर्गीय अप्सरा " या शब्दांत केले आहे. हिरव्यागार पाचूसारख्या झळझळणाऱ्या वनश्रीने नटलेल्या या गावात बोरकरांचे लहानपण गेले ते पावसात भिजण्यात, वडिलधाऱ्यांचा डोळा चुकवून घरामागचा डोंगर पालथा घालण्यात, काजूच्या हिरव्या ढापळया मोडून खाण्यात आणि काळयाभोर जांभळांचा किंवा पिवळ्याधमक आंब्यांचा स्वाद चाखण्यात. निळ्या खाडीच्या काठाला असलेल्या या आपल्या हिरव्या गावाचा बोरकरांना मोठा लळा होता. त्याचे नाव त्यांनी स्वतःच्या नावाबरोबर बिरुदासारखे मिरवले बोरकर. या लहानशा गावात त्याकाळी शाळा नव्हती. कोकणातून पोटासाठी येणारे शिक्षक बोरकरांच्या घरी मुलांना शिकविण्या- साठी नेमले जायचे. पण ते फारसे टिकत नसत. त्यामुळे बोरकरांच्या मराठी शिक्षणाची परवडच झाली. जेमतेम दोन इयत्तांएवढे मराठी शिक्षण त्यांना घेता आले, व पुढील शिक्षणासाठी पोर्तुगीज शाळेत प्रवेश घ्यावा लागला. बोरकरांचे कुटुंब अनेक लहान- मोठ्या विविध नात्यांच्या माणसांनी गजबजलेले एकत्र कुटुंब होते. या घराचा डोलारा त्यांचे वकील चुलते सांभाळीत. बोरकरांचे बालपण तसे संपन्न स्थितीत गेले. शिक्षणासाठी आपले गाव, मोठा वाडा सोडून वेगवेगळ्या गावी ते राहिले. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी ते धारवाडला गेले. ज्या शाळेत आधुनिक मराठी कवितेचे प्रणेते केशवसुत शिकवीत होते, तेथेच आपण शिकतो आहोत या जाणिवेने ते नेहमी भारावलेले असत. मॅट्रिकनंतर कर्नाटक कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला, परंतु खर्च झेपणार नाही म्हणून त्यांना कॉलेज सोडणे भाग पडले. म्हणजेच 1928 सालीच त्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळाला .

  बोरकर मुंबईला आले आणि नोकरीच्या शोधात तुमच्या कवितेचे जन्म झाला .

बोरकरांचा पहिला संग्रह "प्रतिमा" 1930 साली प्रसिद्ध झाला. या संग्रहात 1926 पासून लिहिलेल्या कविता समाविष्ट आहेत. शेवटचा संग्रह "चिन्मयी" 1984 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या संग्रहातली शेवटची कविता 24-4-84 ची आहे. म्हणजेच 1926 ते 1984 अशी सरळ 58 वर्षे बोरकर काव्य लिहीत होते. कवी म्हणून बोरकरांना पहिल्याच संग्रहाने मान्यता मिळवून दिली आणि "जीवनसंगीत" या दुसन्याच संग्रहाने त्यांना कीर्ती, सन्मान व गौरव यांचा लाभ करून दिला. तरी बोरकर तेथेच थांबले नाहीत. कोणत्याही सर्जनशील प्रतिभावंतांप्रमाणे ते पुढे जात राहिले. त्यांनी सतत वेगवेगळ्या भावनुमूतींची क्षेत्रे धुंडाळलो. आविष्काराचे प्रयोग केले. स्वतःच्या जीवनातून, इतरांच्या जीवनातून भोवतीच्या स्थितीतून, बदलत्या वाङमयीन वातावरणातून त्यांचे लवचिक आणि संस्कारक्षम मन वेगवेगळे संस्कार टिपीत गेले आणि त्यानुसार त्यांची कविताही बदलत गेली. जीवनाच्या गतिमान प्रवाहानुसार तिने वेगवेगळे रंग धारण केले. अधिकाधिक सखोलपणे ती स्वतःचा शोध घेत गेली. अधिकाधिक परिपक्व, स्थिर, प्रगाढ होत गेली. आणि तरीही स्वतःचे मूलधर्म ती टिकवून राहिली. बोरकरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो कविता लिहिल्या. तरीही बोरकरांच्या स्वतःच्या शैलीची, शब्दकळेची, वेगळेपणाची स्पष्ट अशी नाममुद्रा त्यांच्या सर्व संग्रहांवर आढळते. याचे कारण हेच आहे.

ही सर्व माहिती बोरकरांच्या मागील पुस्तकातून आदरणीय लेखिका प्रभाकर यांच्या पुस्तकातून घेतलेली आहे .

चांदणवेल या पुस्तकात बोरकरांच्या निवडक कवितांचा खजिना तुम्हा सर्वांसाठी ठेवलेला आहे .संपादक कुसुमाग्रज आणि गो .म .कुलकर्णी यांनी सर्व वाचकांसाठी या पुस्तकाची निर्मिती केली  .पुस्तकात बोरकरांच्या एकूण 88 कविता दिलेल्या आहेत या सर्व कविताच खूपच छान आणि आयुष्याचा मर्म सांगणाऱ्या आहेत .नक्कीच सर्वांना आवडणारा हा निवडक कवितांचा कवितासंग्रह आहे .ज्यांना ज्यांना कविता वाचनाचा लेखनाचा छंद आहे त्यांनी तर आवर्जून हे पुस्तक वाचावे .बोरकर अतिशय सुंदर शैलेत काव्यबद्ध होताना दिसतात .आदरणीय बोरकरांची तेथे कर माझे जाते ही माझी आवडती कविता आहे त्यांच्याच कवितेतून त्यांना मी शेवटी शब्द पुष्पांजली वाहते .नक्कीच तुम्ही सर्वजण हे पुस्तक घेऊन नक्की वाचाल .


तेथे कर माझे जुळती

 दिव्यत्वाची जेथ प्रचीती


हन्मंदिरी संसृतिशरस्वागत हसतचि करिती कुटुंब-हित-रत गृहस्थ जे हरि उरांत रिझवित सदनीं फुलबागा रचिती तेथे कर माझे जुळती🙏🏻🌹🌹🙏🏻


सौ अंजली शशिकांत गोडसे ( शिर्के ) मर्ढे सातारा .