Thursday, March 21, 2024

कवयित्री कविता

 कवयित्री


कान आणि डोळे यांच्यामध्ये असणाऱ्या 

अंतराची जी करते खात्री 

तिलाच म्हणावे कवयित्री 

कल्पनेच्या विश्वात रमणारी 

आकाशगंगेलाही पृथ्वीवर

 अवतरण्यास लावणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री 

कधी इथे तर कधी तिथे हुंदडणारी

 प्रत्येकाचे भावविश्व ओळखणारी

 तिलाच म्हणावे कवयित्री 

स्वप्नातलं सारं सत्यात उतरवणारी

 सत्य सारं अलगद मांडणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री 

उच्च-नीच जातभेद न मानणारी 

तुटक्या फुटक्या वाड्यातही सौंदर्य पाहाणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री 

ताल, सूर, लयबद्धता टिपणारी 

दगडालाही देवत्व आणणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री

 शब्दांचे सामर्थ्य लीलया पेलणारी

 लेखनशैलीतून स्वतःचं वेगळेपण जपणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री 

प्रतिभेचा अमृत कलश पिणारी

 कवितेसाठीच जीवन समर्पित

करणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री

✒️📖

सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के

 मर्ढे सातारा

Wednesday, March 13, 2024

पुस्तक क्र २८ मन सांधते आभाळ

 






वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-२८

पुस्तकाचे नांव- मन सांधते आभाळ

लेखकाचे नांव-  सौ मनिषा शिरटावले

प्रकाशन  व आवृत्ती-  प्रणित प्रकाशन , सातारा प्रथम आवृत्ती २०२१

पृष्ठे संख्या– १००

किंमत /स्वागत मूल्य-- १००₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

२८||पुस्तक परिचय

        मन सांधते आभाळ

लेखक/ कवयित्री -  सौ . मनिषा शिरटावले


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


स्त्री जातीचा जन्मचं  हा जोडण्यासाठी झालेला आहे .तिला कायम  विचार, नाती, परंपरा, संस्कृती यामध्ये एक मिलाप घालून प्रत्येक गोष्ट सांधावी लागते . रांधण आणि सांधण तिच्या आयुष्याला पुरतं .असंच एका कवयित्रीचे मन आभाळ सांधताना दिसत आहे .सौ मनीषा शिरटावले लिखीत मन सांगते आभाळ हा कवितासंग्रह मनाच्या खोलवर कप्प्यात रुतून बसतो .प्रणित प्रकाशन सातारा यांनी या पुस्तकाची अतिशय उत्कृष्ट निर्मिती केलेली आहे .

या कवितासंग्रहात एकूण ७६ कविता आहेत. प्रत्येकाचे आत्मभान जागृत करणाऱ्या अशा या साऱ्याच कविता आहेत कुठे ना कुठे या कवितांमधून प्रबोधनाची एक लकेर आपल्याला दिसून येते.

कवयित्री आपल्या कवितांबद्दल लिहिताना म्हणतात ,प्रत्येक गोष्टीचा तितक्याच ताकतीने समान पद्धतीने स्वीकार करण्याचे बळ निर्माण करता आलं पाहिजे कविता ह्या कधी साचेबंद असाव्या किंवा असतात हे कळलच नाही त्या फक्त निखळ भावनांचे ,जाणिवांचे, सलत्या प्रसंगाचे प्रकटीकरण करणाऱ्या साक्षीदार म्हणून कागदांवर शब्दांद्वारे अवतरल्या .

आपल्या शेतकरी बापा या कवितेतून त्या शेतकऱ्याचं व्यतिरिक्त जीवन शब्दबद्ध करतात .या कवितेत त्या म्हणतात ,


शेतकरी बापा तुझ्या आसवांना

 तुझ्या प्रश्नांना उत्तरे नाहीत 

कष्टाच्या सरी ,घामाच्या धारांना मातीतल्या फळाला , भावना नाहीत


एक गुज देवा तुझ्या पायाशी या कवितेतून त्या प्रयत्नवादी असल्याचे दिसून येते . त्या कवितेत म्हणतात ,


पेटला अग्नी त्या ज्वालातुनी

 प्रगटला तेज घेऊनी

 दीपवेन आता ज्योत होऊनी 

प्रयत्नांना कवेत घेऊनी


अशा विविध विषयांना हात घालून त्यांनी आपल्या मनाद्वारे हे विविध विषयांच आभाळ कवितेत सांधलेले दिसून येत .प्रत्येक कविता ही अतिशय सुंदर शब्दबद्ध केलेली आहे प्रेमासारख्या विषयालाही त्यांनी आपल्या कवितेत शब्दबद्ध केले आहे . विविध विषयांचा फुलांचा काव्यपुष्प सर्व काव्यरसिक प्रेक्षकांच्या आवडीला नक्की उतरेल .मला आवडलेले हे एक सुंदर पुस्तक आज तुम्हा सर्वांसमोर याचे परीक्षण करताना अत्यंत आनंद होत आहे .मनीषा शिरटावले ही माझी मैत्रीणच . लिखाणाबरोबर तिचे शैक्षणिक कार्यही खूप मोठं आहे .सैनिकी परंपरा असलेल्या मिल्ट्री अपशिंगे या शाळेत ती ज्ञानदानाचे कार्य करत आहे .सातारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवणारी तिची आदर्श शाळा आणि त्या आदर्श शाळेतील तिच्यासारखी गुणी शिक्षक यांचा मला कायम अभिमानच आहे . तेव्हा नक्की वाचा मन सांधते आभाळ हा कवितासंग्रह .


धन्यवाद 

सौ .अंजली शशिकांत गोडसे शिर्के

 मर्ढे सातारा