वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ९८
पुस्तकाचे नाव - मराठी निबंध रत्नाकर
लेखकाचे नाव - प्राची गोंधळेकर
प्रकाशन व आवृत्ती-विद्या विकास पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर
पृष्ठे संख्या– १४२
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ८०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
९८||पुस्तक परिचय
मराठी निबंध रत्नाकर
सौ. प्राची गोंधळेकर
मराठी निबंध रत्नाकर” हे एक शैक्षणिक प्रकारचं पुस्तक असून त्याची रचना विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेला गती देण्यासाठी खास केली आहे. प्राची गोंधळेकर यांनी याचे लेखक म्हणून लेखन केले असून हे विद्या विकास पब्लिशर्स प्रा. लि. द्वारा प्रकाशित आहे.
मराठी निबंध रत्नाकर हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याचा विकास साधण्यासाठी खास तयार करण्यात आलेले आहे. हे पुस्तक विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून त्यात विविध विषयांवरील सोप्या व समर्पक निबंधांचा समावेश आहे. यामध्ये जीवनविषयक, सामाजिक, पर्यावरणीय, शैक्षणिक, राष्ट्रप्रेमाशी संबंधित आणि सण-उत्सव आदी विविध प्रकारचे निबंध दिलेले आहेत.
या पुस्तकाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत
भाषा अतिशय सोप्या व विद्यार्थ्यांना समजणाऱ्या पद्धतीने आहे.
निबंधांचे सामान्य मांडणी क्रम ठेवलेले आहे: प्रस्तावना – मुख्य विषय – उपसंहार.
परीक्षेसाठी उपयुक्त दृष्टिकोन स्पष्ट केला आहे.
व्याकरणदृष्ट्या शुद्ध आणि अभ्यासू.
🎯 उपयुक्त कोणासाठी?
इयत्ता ३री ते १०वी पर्यंतचे विद्यार्थी
मराठी निबंध स्पर्धांमध्ये भाग घेणारे विद्यार्थी
शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी अभ्यास साहित्य म्हणून
मराठी निबंधाचा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठीच हे पुस्तक उपयुक्त आहे. पुस्तकात एकूण 67 निबंधांचा समावेश केलेला आहे. लेखिकेने निबंध लिहिताना विविध विषयांचे हाताळणी केलेली दिसून येते .
यामधील ग्रंथ हेच गुरु हा वाचन प्रवासाविषयीचा निबंध मला विशेष आवडला .आपल्या वाचन साखळीचा हेतूच वाचाल तर वाचाल हा आहे .ग्रंथ हेच गुरु हा निबंध लिहिताना त्या म्हणतात,
"जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरू म्यां केला जाण । गुरूसी आले आपरपण । जग संपूर्ण गुरू दिसे ।।"
चराचरसृष्टीत गुरूत्तत्त्व ओतप्रोत भरलेले आहे असा संतांचा अनुभव. माता, पिता, शिक्षक, निसर्ग, जीवनातील चांगलेवाईट अनुभव, छोटेमोठे प्रसंग, सभोवताली वावरणाऱ्या व्यक्ती अगदी क्षुद्रातिशूद्र जीवजंतू या सर्वांपासून आम्ही सतत काही ना काही शिकत असतो. त्यामुळे ते आमचे गुरूच आहेत. आपापल्या परीने ते श्रेष्ठच आहेत. या समस्त गुरुंमध्ये मुकुटमणी, कंठमणी आणि मेरूमणी जर कोणता असेल तर तो म्हणजे ग्रंथ.
श्री समर्थांनी 'आता सद्गुरू वर्णवेना' अशा शब्दात गुरूस्तवनाला प्रारंभकेला आहे. ग्रंथांनाही हे वर्णन अगदी तंतोतंत लागू पडतं. विशेष म्हणजे ते एकाही गुणाची परीक्षा घेत नाहीत, एका बोटाची चापट मारत नाहीत की एका शब्दाने कोणाला दुखवीत नाहीत.
आई, वडील, शिक्षक यांना स्थलकालाच्या मर्यादा असतात. कार्यबाहुल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन सदासर्वकाळ लाभू शकत नाही. शिवाय प्रत्येकाला प्रत्येक विषयाचं ज्ञान असलेच असेही नाही. ग्रंथगुरू मात्र सर्वज्ञ. ज्ञानामृताचे अक्षयकुंभ घेऊन दिवसरात्र आपली ज्ञानतृषा शमविणारे केवळ ग्रंथ आणि ग्रंथच आहेत. थकवा, कंटाळा, विश्रांती त्यांना माहीत नाही. कवडीचीही अपेक्षा न करता ज्ञानाची भूक भागविणाऱ्या ग्रंथांच्या दातृत्वाला तोड नाही. खरं पाहिलं तर देणे आणि घेणे हे हातांचं काम. परंतु ग्रंथांजवळ घेणारे हात नाहीतच. ते अनंत हस्ताने देत राहतात, देतच राहतात.
किती सुंदर विचार त्यांनी या निबंधातून मांडलेले आहेत .असेच प्रत्येक विषयातील त्यांचे विचार हे वाचनीय आणि अनुकरणीय आहेत .प्रत्येकाने वाचलेच पाहिजे एवढं सुंदर हे पुस्तक आहे .
शब्दांचे सामर्थ्य या विषयीचं त्यांचा निबंध ही खूप सुंदर आहे .शब्दांचे महत्त्व त्या आपल्या शैलीत अतिशय सुंदर रित्या व्यक्त करतात .
शब्दसृष्टीचे ईश्वर (कवी) तर ह्या शब्दांवर बेहद्द खूश आहेत. ते शब्दांचे
'ऋणाईत' आहेत. शब्द त्यांना मातेसमान पोटाशी घेतात, प्राणप्रिय सखा होऊन धीर देतात, मार्ग दाखवितात. कवी केशवसुत 'शब्दांनो, मागुते या' अशी नम्र विनवणी करतात. तुकाराम महाराज
"आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू"
असा त्यांचा बहुमान करतात. शब्द हाच त्यांचा देव. शब्दांनीच ते त्याची पूजा बांधतात. शब्दांवर त्यांचं इतकं जीवापाड प्रेम की 'शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन' असा भाव ते प्रगट करतात. शब्दसृष्टीचा संपूर्ण डोलारा शब्दशेषाच्या फण्यावर उभा आहे. शब्दांचा महिमा कितीही सांगितला तरी संपणार आहे थोडाच ! शेवटी एवढेच म्हणता येईल.
"शब्दवर्णना शब्द तोकडे, शब्दांविण पण सांगू कसे?"
खरोखर प्रत्येक पुस्तकाविषयी भरभरून बोलताना असंच होत असतं .ते पुस्तकाचे वर्णन करताना शब्द तुकडे पडतात पण शब्दांशिवाय आपण तो परिचय सांगू शकत नाही असे सर्व काही शब्दातीत .मग वाचणार नाही पुस्तके वाचायलाच हवीत .
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment