Thursday, April 24, 2025

पुस्तक क्र. ५६ मराठी पत्रकारिता

 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ५६

पुस्तकाचे नाव -  मराठी पत्रकारिता

लेखकाचे नाव -  ए .व्ही . देशपांडे

प्रकाशन  व आवृत्ती-  सुखदा सौरभ प्रकाशन पाटण सातारा

पृष्ठे संख्या–  ११२

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १००

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

५ ६ ||पुस्तक परिचय

मराठी पत्रकारिता

ए .व्ही .देशपांडे


लोकशाही म्हणजे लोकांच्या, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेली सत्ता. अशा या लोकशाहीच्या यशस्वी आणि प्रभावी कार्यासाठी चार स्तंभ आवश्यक असतात – विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि पत्रकारिता. यातील पत्रकारितेला ‘चौथा स्तंभ’ म्हटले गेले आहे, कारण ती इतर तीन स्तंभांवर लक्ष ठेवण्याचं, त्यांची योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आणि समाजाला जागृत ठेवण्याचं महत्त्वाचं काम करते.

पत्रकारिता ही फक्त बातम्या देणारी गोष्ट नाही, तर ती समाजाचं आरसाच आहे. समाजात काय घडतं आहे, कोणते निर्णय घेतले जात आहेत, सामान्य माणसावर त्याचा काय परिणाम होतो, हे सर्व पत्रकारिता जनतेपुढे आणते. म्हणूनच पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा प्राणवायू आहे.

पत्रकारिता ही कशी असली पाहिजे? पत्रकारितेतील विविध प्रकार पत्रकारिता करणे म्हणजे नक्की काय याविषयी सुंदर विवेचन मराठी पत्रकारिता या पुस्तकात देशपांडे सरांनी केलेल आहे .मी ज्यावेळेस पत्रकारितेचा कोर्स करत होते त्यावेळेस हे पुस्तक मी आवर्जून विकत घेतलं आणि त्याचा अभ्यास केला .

चांगली पत्रकारिता लोकांना सत्य माहिती देते, प्रश्न विचारते, सरकारची जबाबदारी ठरवते आणि समाजात विचारांची चळवळ निर्माण करते. जर पत्रकारिता स्वतंत्र, सत्यनिष्ठ आणि निःपक्ष असेल, तर ती लोकशाहीला बळकटी देते. परंतु, जर ती भ्रष्ट, पक्षपाती किंवा खोट्या माहितीवर आधारित असेल, तर ती लोकशाहीला कमकुवत बनवते.

आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेने नवा चेहरा घेतला आहे. सोशल मिडिया, ऑनलाईन न्यूज पोर्टल्स, यूट्यूब पत्रकारिता यामुळे माहिती वेगाने पोहोचते. पण त्याचबरोबर खोट्या बातम्यांचा धोका वाढला आहे. त्यामुळे सजग आणि जबाबदार पत्रकारिता अधिक आवश्यक झाली आहे.

एक प्रबुद्ध आणि जबाबदार पत्रकारिता हीच खरी लोकशाहीची हमी आहे. पत्रकारितेने फक्त माहिती पोहोचवून थांबू नये, तर ती समाजाला जागवावी, चुकीच्या गोष्टींना प्रश्न विचारावेत, आणि लोकशाहीला योग्य मार्ग दाखवावा. म्हणूनच, आपण सर्वांनी चांगली पत्रकारिता ओळखून तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे – कारण तीच आहे लोकशाहीचा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ.

पत्रकारिता म्हणजे माहिती संकलन, सत्य पडताळणी, आणि ती माहिती समाजासमोर सादर करण्याची एक प्रक्रिया आहे. यामध्ये वर्तमानपत्रे, टीव्ही, रेडिओ, इंटरनेट आदी माध्यमांचा समावेश होतो.

सरळ भाषेत सांगायचं झालं तर, पत्रकारिता म्हणजे समाजात घडणाऱ्या घडामोडींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम.


यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:


बातम्या संकलन आणि लेखन


मुलाखती घेणे


घटनास्थळी जाऊन रिपोर्टिंग करणे


सत्य पडताळणी (फॅक्ट चेकिंग)


समाजाला माहितीपूर्ण, निष्पक्ष आणि योग्य वेळेवर माहिती देणे .

अशी कितीतरी कामे पत्रकारांना करावी लागतात .

या पुस्तकाला माधव गडकरी यांची प्रस्तावना मिळालेली आहे आपल्या प्रस्तावनेत ते पत्रकारितेच्या विषयी लिहिताना म्हणतात,वृत्तपत्र व्यवसायात नव्याने प्रवेश करू पाहणाऱ्यांना मार्गदर्शक ठरावी असेही पुस्तक आहे .पत्रकाराला प्रत्यक्ष काम करताना आज उपयोगी पडेल असे बातमी वाचून स्तंभ लेखनापर्यंतचे सर्व मार्गदर्शन लेखकाने या पुस्तकात केलेले आहे .

ताजी बातमी हाच शेवटी वृत्तपत्राचा प्राण आहे पोटी माणूस वृत्तपत्र वाचतो असे देशपांडे म्हणतात हे खरे आहे त्यांनी बातमीची एक व्याख्या केली आहे .नवलाई युक्त नवीन व ताजी माहिती की ज्यामध्ये वाचकाला स्वारस्य वाटेल जी वाचकांची जिज्ञासा तृप्त करू शकेल तीच खरी बातमी होईल असे देशपांडे म्हणतात .

तसं पाहायला गेलं तर प्रसार माध्यमे चांगली का वाईट हा संशोधनाचा विषय आहे आणि  यावर संशोधन करणं ही सोपी गोष्ट  .

पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आपण कोणती बाजू पाहतो हे आपल्यावर अवलंबून असतं .

मराठी पत्रकारिता या पुस्तकात देशपांडे सरांनी एकूण नऊ प्रकरणे दिलेली आहेत .त्या प्रत्येक प्रकरणात त्या त्या विभागाची अगदी सखोल माहिती दिलेली आहे .त्यांना पत्रकारिता करावयाची आहे जे लिहीत आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक मार्गदर्शक गुरुच आहे .

१. मराठी पत्रकारिता - विहंगमावलोकन


२. दक्षिण महाराष्ट्रातील पत्र - परंपरा


३. वृत्तपत्राचे व्यवस्थापन


४. वार्तालेखन आणि संपादन


५. ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंपर्क


६. वार्तालेख, स्तंभलेखन व पुरवणीसंपादन


७. दृक् - श्राव्य प्रसारमाध्यमे


८. पत्रकारिता आणि कायदा


९. संदर्भ सूची

या नऊ प्रकरणांमधून त्यांनी अतिशय सुंदर पत्रकारितेचे विवेचन केलेलं आहे .फक्त माहितीही दिली नाही तर ज्याच्या माहितीसाठी आवश्यक छायाचित्र आहेत तीही या पुस्तकात दिलेली आहेत प्रत्यक्ष काम करत असताना ते काम कसं केलं जातं वृत्तपत्राची छपाई कशी केली जाते गोळा कसे केले जाते याची सर्व छायाचित्रे या पुस्तकात आहेत .

वर्तमानपत्रात काम करत असताना संपादकीय विभागाची कशी रचना असते संपादक हा वृत्तपत्राचा प्रधान किंवा प्रमुख असतो आणि त्याच्या खाली कोण काम करतं याचीही विस्तृत माहिती दिलेली आहे .

वर्तमानपत्रात आपली एखादी बातमी छापून आली तर आपल्याला किती आनंद होतो मग ती बक्षीसाची असो नाहीतर आपण केलेल्या एखाद्या चांगल्या कामाची पोचपावती असो .पण हा बातमीचा प्रवास कसा होतो हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच हे पुस्तक आपल्याला वाचा वेळेस हवा सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलवर आपण ताजी बातमी लगेचच पाहतो पण वर्तमानपत्र हातात घेऊन चहा पीत किंवा गॅलरी निसर्गरम्य ठिकाणी बसून वर्तमानपत्र वाचण्याचा आनंद काही औरच असतो .वर्तमानपत्र हातात घेतल्याशिवाय काही काहींचा दिवसही सुरू होत नाही असं हे आपल्या घरी येणार दररोजचं वर्तमानपत्र आपला रोजचा माहिती देणारा खरा पाहूणाच असतो .नक्की वाचा हे पुस्तक धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment