Monday, January 1, 2024

पुस्तक क्र.२० शब्दक्रांतीचे शाहिरी पर्व

 .




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२०
पुस्तकाचे नांव- शब्दक्रांतीचे शाहिरीपर्व
लेखकाचे नांव- श्री . प्रदीप कांबळे 
प्रकाशन  व आवृत्ती- पहिली प्रणित प्रकाशन ,सातारा,प्रथमावृत्ती २०२३
पृष्ठे संख्या– १४२
किंमत /स्वागत मूल्य-- १३०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८||पुस्तक परिचय
         शब्दक्रांतीचे शाहिरीपर्व 
लेखक / संकलक - श्री . प्रदीप कांबळे 
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
आदरणीय प्रदीप कांबळे सर्वांचे मार्गदर्शक सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कवी लेखक आणि व्याख्याते म्हणून त्यांचे नाव सर्वत्र घेतले जाते .त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या शब्दक्रांतीचे शाहिरी पर्व हे पुस्तक माझ्या वाचनात आले .त्यांचे स्वतःचेच प्रणित प्रकाशन कडून हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे .या पुस्तकाची अर्पण पत्रिका त्यांनी आपल्या आजोबांच्या नावे लिहिलेली आहे. ते लिहितात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या समवेत मुलुख भर प्रबोधन यात्रा करणारे माझे आजोबा कै. भाऊसाहेब संतू कांबळे यांना हे शाहिरी पर्व समर्पित.
महाराष्ट्राची शाहिरी परंपरा दाखवणार देखणं मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभलेल आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी या निमित्ताने आपल्याला चित्रातून दिसून येते.
या पुस्तकाच्या अंतरंगामध्ये पुढील शाहिरांची सविस्तर माहिती दिलेली आहे.
१) शाहीर राम जोशी (राम जगन्नाथ जोशी, सोलापूर)

(१७६२ ते १८१३)

२) शाहीर अनंत फंदी (अनंत भवानीबाबा घोलप, संगमनेर)

(१७४४ ते १८१९)

३) शाहीर होनाजी बाळ (होनाजी सयाजी शिलारखाने, पुणे)

(१७५४ ते १८४४)

४) शाहीर परशराम मु. वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक

(१७५४ ते १८४४)

५) शाहीर प्रभाकर जनार्दन दातार, रत्नागिरी

(१७५५ ते १८४३)

६) शाहीर सगनभाऊ सगन शिकलगार, जेजूरी

(१७७८ ते १८५०)
आपल्याला या शाहिरांच्या बद्दल शोधूनही काही माहिती सापडणार नाही. अशी त्यांची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे .या पुस्तकाला साक्षात सातारा भूषण पुरस्कार प्राप्त आमच्या सातारा जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती संभाजी मालिकेचे लेखन करून आपल्या लेखनाने वेड लावणारे आदरणीय प्रताप गंगावणे सर यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
आदरणीय प्रतापजी गंगावणे आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,
" प्रदीप यांचा शब्दक्रांतीचा उठाव डोळ्यांत भरतो. वाचताना शाहिरी शब्दांची रंग आणि रंग वाचकाच्या काळजाला भिडवण्यास ते यशस्वी झालेत, हे या ग्रंथाचं वेगळेपण आहे आणि म्हणूनच शेवटी प्रदीप यांच्या या कामाबद्दल म्हणावसं वाटतं, की तुम्ही धाडसाने प्रतिभासंपन्न शाहिरांच्या डफावर थाप मारलीत ; पण जाणता रसिक प्रेक्षक मात्र तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार हे निश्चित."
खरोखरच अतिशय देखण असे हे पुस्तक निर्माण झालेल आहे.
नावातच तेजाचा दीप असणारे आदरणीय प्रदीप जी त्यांच्या लेखणीतून अनेक साहित्याच्या दरबारी अक्षर दिवे लावत असतात.
शाहीर राम जोशींचे शृंगार रसातील ही रचना  सर्वांना सुपरिचित आहे.
सुंदरा मनामध्ये भरली जरा नाहीं ठरली हवेलित शिरली मोत्याचा भांग ।
अरे गड्या हौस नाहीं पुरली म्हणोनि विरली पुन्हा नाहीं फिरलि कुणाची सांग ।। धृ.।।
अशाच अनेक अपरिचित आणि परिचित शाहीर राम जोशींच्या रचना या पाठ्यपुस्तकात दिलेल्या आहेत .खूपच अभ्यासू  व्यक्तिमत्व असलेले कांबळे सर प्रत्येक शाहिरांच्या घरापर्यंत ,नातेवाईक यांच्याजवळ  जाऊन पोहोचले आणि त्यांनी माहिती संकलित केली.
एवढ मोठ कार्य असंताना ही आपल्यातला वेचकपणा त्यांनी काय आबादीत ठेवला.
त्यांच्यातला हाच गुण सर्वांना आवडतो. इतरही शाहिरांच्या इतिहास आणि त्यांच्या लुप्त होत चाललेल्या रचना या पुस्तकात दिलेल्या आहेत.
पुस्तकाचे शेवटी आदरणीय कांबळे सरांनी हे पुस्तक लिहिण्यापूर्वी कोण कोणत्या ग्रंथांचा संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यास केला याची सविस्तर यादी दिलेली आहे .म्हणजे एखादं पुस्तक लिहिताना किती अभ्यास करावा लागतो याची प्रचिती येते. नुसत आलं मनात आणि लिहिलं असं करून चालत नाही त्याची पार्श्वभूमी हे सर्व माहीत असल्याशिवाय आपण काहीच लिहू शकत नाही. आदरणीय कांबळे सरांनी लोकसाहित्याचा गाढा अभ्यास केलेला आहे त्यामुळेच एवढं सुंदर पुस्तक त्यांच्या लेखणीतून उतरले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलागुणांची माहिती देणारा जणू काही लघुपट या पुस्तकातून अवतरलाय असे मला वाटते. आदरणीय कांबळे सरांच्या लेखणीला माझा मानाचा मुजरा .अशीच तुमच्या लेखणीतून सरस्वतीची प्रसादरुपी पुस्तके उतरत राहावीत. याच साहित्य देवतेचरणी प्रार्थना🙏🏻😊





No comments:

Post a Comment