Wednesday, January 24, 2024

मांढरदेव दुर्घटना 25 जानेवारी

 एकोणवीस वर्षांपूर्वीचा तो आजचा दिवस 25 जानेवारी 2005


आठवलं का काही ?कसं आठवणार ? एकोणवीस वर्षे झाली त्या घटनेला 25 जानेवारी 2005 

पौष पौर्णिमा मांढरदेव यात्रेचा मुख्य दिवस . 

आठवले ना !


म्हणजेच मांढरदेव दुर्घटना .ज्यात शेकडो लोक मारले गेले . श्रद्धेपोटी की अंधश्रद्धेपोटी हा ज्याचा त्याने विचार करावा . अनेक लोकांचा नाहक बळी त्या यात्रेत गेला . त्या यात्रेची मी एक साक्षीदार .नुकतच मला नोकरीला लागून एक महिना झाला होता मी मांढरदेवी येथील कोचळेवाडी शाळेत शिक्षक म्हणून हजर झाले होते पण मांढरदेव शाळेत काम करत होते . प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची ती माझी शिक्षक म्हणून पहिलीच वेळ आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच घडलेली ही दुर्घटना . माझ्याच नव्हे तर साऱ्या जनतेच्या अंगावर रोमांच उभा करणारी . चेंगराचेंगरी, , पळवा पळवी ,सिलेंडरचे स्फोट अजूनही डोळ्यासमोर सर्व काही तसेच उभ राहतं .ॲम्बुलन्स आवाज पोलीस गाड्यांची , मंत्र्यांचे दौरे किती आणि काय किती आठवायचं किती साठवायचं . मन सुन्न करून टाकणारी ती घटना आजही भयावह वाटते .

दुपारपर्यंतची शाळा करून मुलांना घेऊन मीही मांढरदेवची यात्रा पाहण्यासाठी गडावर जाणार होते . पण माझी शाळा सुटण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली आणि शाळेच्या परिसरातूनच लांबूनच मी हे सगळे पाहत होते .अफवांना तर उत आला होता . सगळीकडे नुसती धावा धाव गाड्यांची आणि माणसांची !तोपर्यंत ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती आमच्या घरच्यांना तर माहीत होतं की मी यात्रेत जाणार आहे त्यामुळे नक्की काय प्रकार झाला हे त्यांना समजायला तयार नव्हतं .कोल्हापूर झेडपीतून बदली होऊन जावली पंचायत समितीत हजर झाले होते . त्यांनाही तिथे बातमी समजली आणि त्यांच्या  पायाखालची जमीन सरकली .नशीब त्यावेळेस माझ्याकडे एकोणवीस वर्षापूर्वी मोबाईल होता .त्यामुळे मी सर्वांशी संपर्क करू शकले आणि सुखरूप असल्याचे सांगू शकले .माझी ती सुखरूप ची बातमी आमच्या घरच्यांना पोचली पण या यात्रेत ज्यांचे बळी गेलेत त्यांच्या घरच्यांचं काय त्यांच्यावर तर आभाळ कोसळल होतं .

मांढर गडावर येणाऱ्या सर्व खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली होती .फक्त पोलीस आणि आरोग्य खात्यांच्या गाड्यांना मुभा देण्यात आली होती .त्यावेळेस कोचळेवाडी शाळेतील माझ्या सहकारी मांढरे मॅडम या मांढरदेवीच्या असल्यामुळे त्या यात्रेच्या रजेवर होत्या . शाळेत मी एकटीच होते . नवीन हजर झालेली .अशी दुर्घटना घडलेली माझ्यावर काय प्रसंग बेतला असेल ते माझं मलाच माहीत .शाळेच्या वर्ग खोल्याही यात्रेकरूंसाठी देण्याच्या सूचना आल्या त्याप्रमाणे आम्ही शाळेच्या वर्ग खोल्याही यात्रेकरूना दिल्या .अतिशय भयानक असे चित्र डोळ्यासमोर होतं . मांढरदेवीकडे जाण्याला पाऊलही उचलत नव्हतं . माणसांनी त्यांचे नातेवाईकांची प्रेतही गाडीत घालून गुपचूप घेऊन गेली म्हणजे काय परिस्थिती आली असेल याचा विचार करा .एवढ्या आनंदाने सुख समाधानाने आलेली माणसं यात्रा न करताच निघून गेली .काहींनी तर आपल्या डोळ्या देखत आपल्या माणसांचा जीव जाताना पाहिला .गर्दीत त्यांना चेंगरताना पाहिलं .डोळ्यासमोर दिसणारी माणसं अचानक पायदळी तुडवली गेली आणि हाहाकार झाला .आई काळुबाईच्या पायऱ्यांवर अनेक जणांचे बळी गेले .या दुर्घटनेनंतर कित्येक दिवस सर्वत्र शांतता पसरली होती . दुसऱ्या दिवशीचे प्रजासत्ताक दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले .मी त्या रात्री कोचळेवाडीतच अंगणवाडी सेविकांच्या घरी मुक्काम केला .पण झोप कुठे लागत होती रात्रभर सायरनचे आवाज कानात, मनात , हृदयात धडाडत होते .साधेपणाने प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी वाईला जायला निघाले पण वाईला जाणारी कोणतीच गाडी मिळत नव्हती .शेवटी वाई वरून येणाऱ्या एका गाडीत मी बसून वरती मांढरदेवला गेले .आणि पाहिलं तर सगळीकडे स्मशान शांतता पसरलेली होती आणि देवीच्या हिरव्या साड्या प्रेतांवर झाकलेल्या होत्या .सगळीकडे आगीची लोट ,धुरांचे लोट दिसत होते .प्रसाद ,हळदी कुंकू सगळीकडे अस्ताव्यस्त पडलेली होते . चपल्यांचे ढीग लागलेले होते .डोळ्यांनाही न पाहवणार विदारक दृश्य माझ्या दृष्टीस पडलं .मी मात्र त्या गाडीतून एकही पाऊल खाली ठेवला नाही खिडकीतून सारे पाहून तशीच गाडीत बसून राहिले . गाडी निघाल्यानंतर सारं काही मनात साठवून ठेवलं होतं ओठातून शब्द फुटत नव्हते आणि डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते .कधी घरी पोहोचेल असं झालं होतं . घराच्या दारात मला सुखरूप पाहून सगळ्यांनी एक मोठा उसासा सोडला .तुम्हीच आता विचार करा हे सगळं कशामुळे झाले असेल ? श्रद्धाअसल्यामुळे का अंधश्रद्धा असल्यामुळे ! अजूनही लोक आपल्या वेडा पायी नको त्या भूलथापांना बळी पडतात आणि अशा प्रसंगांना आपल्याला समोर जावं लागतं .कदाचित नारळ फोडणे, तेल घालणे त्यामुळे तर हा प्रसंग ओढावला नसेल !

ते काहीही असो या प्रसंगातून आपणही बोध घेतला पाहिजे असे प्रसंग पुन्हा कधीच घडू नयेत एवढेच वाटतं .या प्रसंगातून मात्र मला बरच काही अनुभवायला मिळालं .अजूनही म्हणाव्या अशा सोयी सुविधा मांढरदेवला झालेले नाहीत एवढी वर्षे झाली तरी अजूनही त्याच प्रथा परंपरा पाळल्या जातात .तेव्हा सर्व यात्रेकरूंना नम्र आवाहन कोणत्याही ठिकाणी यात्रेला जाताना सावधानता बाळगा .

✒️©️

सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

1 comment:

  1. खुपच भयानक घटना ... आपण केलेल्या वर्णनाने अंगावर शहरे आलेत... खूप छान !

    ReplyDelete