वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-३०
पुस्तकाचे नांव- बाळकृष्ण भगवंत बोरकर
कवयित्री - प्रभा गणोरकर
प्रकाशन व आवृत्ती- साहित्य अकादमी आवृत्ती पहिली
पृष्ठे संख्या– ११२
किंमत /स्वागत मूल्य-- ४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
३०||पुस्तक परिचय
बाळकृष्ण भगवंत बोरकर
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
देखणे ते हात ज्यांना,
निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले,
सुंदराचे सोहळे ॥
देखणी ती पाऊले,
जी ध्यासपंथे चालती । वाळवंटातूनसुद्धा,
स्वस्तिपद्म रेखिती ॥
बा . भ . बोरकरांची नितांत सुंदर मला आवडणारी हि कविता . कवितेचे नावच खूप सुंदर आहे 'असे देखणे होऊया'.
बोरकरांचे लेखन आणि त्यांच्या कविता यावर माझ अपार प्रेम . खूपच सुंदर असं त्यांचे लेखन . त्यांचा चांदणवेल हा संपादित काव्यसंग्रह मला खूपच आवडतो.
अशीच पुस्तके वाचत असताना शाळेच्या लायब्ररीत साहित्य अकादमीचे हे पुस्तक माझ्या हाती लागले .आणि भरभर ते वाचून काढले .आदरणीय प्रभा गणोरकर मॅडम यांनी अतिशय सुंदर असा परिचय आणि बोरकरांचा जीवन वृत्तांत या पुस्तकात मांडलेला आहे .
कविवर्य बा. भ. बोरकर यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1910 रोजी गोव्यातील कुडचडे या गावी त्यांच्या आजोळी झाला. गोवा हा अत्यंत निसर्गरम्य प्रदेश.बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर, " या गोव्याच्या भूमीत मघाचे नारळ असतात,कड्याकपारींतून दुधाचे घट फुटतात, आंब्याफणसांची रास असते, इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या धारा खेळतात..." इथे बोरकरांचे बालपण गेले. त्यातही बोरकरांचे गाव बोरी. या गावाच्या सृष्टीचे वर्णन वि. स.खांडेकर यांनी. "स्वर्गीय अप्सरा" या शब्दांत केले आहे. हिरव्यागार पाचूसारख्या झळझळणाऱ्या वनश्रीने नटलेल्या या गावात बोरकरांचे लहानपण गेले ते पावसात
भिजण्यात, वडिलधाऱ्यांचा डोळा चुकवून घरामागचा डोंगर पालथा घालण्यात, काजूच्या हिरव्या ढापळया मोडून खाण्यात आणि काळ्याभोर जांभळांचा किंवा पिवळ्याधमक आंब्यांचा स्वाद चाखण्यात. निळ्या खाडीच्या काठाला असलेल्या या आपल्या हिरव्या गावाचा बोरकरांना मोठा लळा होता. त्याचे नाव त्यांनी स्वतःच्या
नावाबरोबर बिरुदासारखे मिरवले बोरकर. या लहानशा गावात त्याकाळी शाळा नव्हती. कोकणातून पोटासाठी येणारे शिक्षक बोरकरांच्या घरी मुलांना शिकविण्या-साठी नेमले जायचे. पण ते फारसे टिकत नसत. त्यामुळे बोरकरांच्या मराठी शिक्षणाची परवडच झाली. जेमतेम दोन इयत्तांएवढे मराठी शिक्षण त्यांना घेता आले, व पुढील शिक्षणासाठी पोर्तुगीज शाळेत प्रवेश घ्यावा लागला. बोरकरांचे कुटुंब अनेक लहान-मोठ्या विविध नात्यांच्या माणसांनी गजबजलेले एकत्र कुटुंब होते. या घराचा डोलारा त्यांचे वकील चुलते सांभाळीत. बोरकरांचे बालपण तसे संपन्न स्थितीत गेले. शिक्षणासाठी आपले गाव, मोठा वाडा सोडून वेगवेगळ्या गावी ते राहिले.
मॅट्रिकच्या परीक्षेसाठी ते धारवाडला गेले. ज्या शाळेत आधुनिक मराठी कवितेचे प्रणेते केशवसुत शिकवीत होते, तेथेच आपण शिकतो आहोत या जाणिवेने ते नेहमी भारावलेले असत. मॅट्रिकनंतर कर्नाटक कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला, परंतु खर्च झेपणार नाही म्हणून त्यांना कॉलेज सोडणे भाग पडले. म्हणजेच 1928 सालीच
त्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळाला.
तिथून पुढे ते मुंबईला आले .
मुंबईतूनच पुढे त्यांच्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात झाली.
बोरकरांचा पहिला संग्रह "प्रतिमा" 1930 साली प्रसिद्ध झाला. या संग्रहात 1926 पासून लिहिलेल्या कविता समाविष्ट आहेत. शेवटचा संग्रह "चिन्मयी" 1984 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या संग्रहातली शेवटची कविता 24-4-84 ची आहे. म्हणजेच 1926 ते 1984 अशी सरळ 58 वर्षे बोरकर काव्य लिहीत होते. कवी म्हणून बोरकरांना पहिल्याच संग्रहाने मान्यता मिळवून दिली आणि "जीवनसंगीत" या दुसन्याच संग्रहाने त्यांना कीर्ती, सन्मान व गौरव यांचा लाभ करून दिला. तरी बोरकर तेथेच थांबले नाहीत. कोणत्याही सर्जनशील प्रतिभावंतांप्रमाणे ते पुढे जात राहिले. त्यांनी सतत वेगवेगळया भावनुभूतींची क्षेत्रे धुंडाळलो. आविष्काराचे प्रयोग केले. स्वतःच्या जीवनातून, इतरांच्या जीवनातून भोवतीच्या स्थितीतून, बदलत्या वाङमयीन वातावरणातून त्यांचे लवचिक आणि संस्कारक्षम मन वेगवेगळे संस्कार टिपीत गेले आणि त्यानुसार त्यांची कविताही बदलत गेली. जीवनाच्या गतिमान प्रवाहानुसार तिने वेगवेगळे रंग धारण केले. अधिकाधिक सखोलपणे ती स्वतःचा शोध घेत गेली. अधिकाधिक परिपक्व, स्विर, प्रगाढ होत गेली. आणि तरीही स्वतःचे मूलधर्म ती टिकवून राहिली. बोरकरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो कविता लिहिल्या. तरीही बोरकरांच्या स्वतःच्या शैलीची, शब्दकळेची, वेगळेपणाची स्पष्ट अशी नाममुद्रा त्यांच्या सर्व संग्रहांवर आढळते. याचे कारण हेच आहे.
अशा या बोरकरांना नेहमीच वाचलं पाहिजे त्यांना जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही हे पुस्तक वाचाव अशी माझी तीव्र इच्छा आहे. त्यामुळे पुस्तकाविषयी तुमचे उत्कंठा अजून वाढली पाहिजे .बोरकरांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर
" यज्ञी ज्यांनी देऊनी निज शिर घडिले मानवतेचे मंदिर परी जयांच्या दहनभूमीवर नाहि चिरा नाही पणती - तेथे कर माझे जुळती "
सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

No comments:
Post a Comment